महाराष्ट्राला सापत्न वागणूक
राज्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं असताना केंद्र सरकारनं मदतीचा हात पुढं करणं गरजेचं होतं. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून महाविकास आघाडी सरकारनं तातडीनं १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं. परंतु, केंद्राने अजूनही मदत केलेली नाही. दोन महिने झाले तरी अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथकही आले नाही. केंद्राची ही भूमिका राज्याला सापत्नभावाची वागणूक देणारी आहे, असं थोरात म्हणाले.
वाचा: सरनाईक हे कोणी साधूसंत नाहीत; ‘या’ नेत्याचा जोरदार टोला
‘करोना संकटामुळे महसूल घटला आहे तर दुसरीकडे संकटांची मालिकाच सुरू आहे अशा परिस्थीतीत केंद्र सरकारनं राज्याला मदतीचा हात दिला पाहिजे, पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही. उलट जीएसटी परतावा व राज्याच्या हक्काचे पैसेही दिले जात नाहीत. विरोधी पक्षांच्या सरकारांची कोंडी करण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा प्रयत्न आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
वाचा: प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे; भुजबळांना ‘ही’ शंका
‘वीजबिलात सवलत मिळाली पाहिजे ही काँग्रेसचीही भावना आहे परंतु केंद्र सरकार जनतेची दररोज लूट करत आहे. जागतिक पातळीवर क्रूड ऑईलचे भाव कमी असताना देशात मात्र पेट्रोल डिझेल महाग विकून केंद्र सरकार जनतेची लूटमार करत आहे. विजबिलाच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांनी या लूटमारी विरोधातही आंदोलन करावे,’ असा टोला त्यांनी हाणला.
‘मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे काय झाले?’
महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे दिवास्वप्न भाजपाचे नेते पाहत आहेत. त्यांनी ही स्वप्ने पाहत राहावीत, असा टोला थोरात यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला. ‘मी पुन्हा येईन असं म्हणणाऱ्यांचं काय झालं, हे आपण पाहतच आहोत. महाराष्ट्रात भाजपचं कोणतंही ‘ऑपरेशन’ यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडी सरकारनं एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असून पुढील चार वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करू,’ असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.
वाचा: भाजपच्या १०० लोकांची यादी पाठवून देतो; राऊतांचं ईडीला आव्हान